तुमच्या आश्वासनांच्या पुर्ततेवर मतदार हिशोब करणार; मैदान सोडू नका, लंकेंच्या वक्तव्यावर विखेंचा टोला
सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्या लोकसभा न लढवण्याच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
आपण निवडणुकीच्या अगोदर (Loksabha) जे आश्वासन दिले आहेत त्याचं मोजमाप लोकसभेला होईल. त्यामुळे आमच्या सर्व महायुतीच्या लोकांची इच्छा आहे की, निलेश लंके यांनी लोकसभा लढवावी. त्यांनी जर लढवायची नाही असं ठरवलं असेल तर तो सर्व मतदारांचा मोठा अपमान आहे असं म्हणत सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्या लोकसभा न लढवण्याच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
कुणाची तरी जिरवायची होती म्हणून लोकसभा लढविली; आता विधानसभा लढणार…लंकेंची घोषणा
लंके काय म्हणाले होते?
कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढविली; मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे.” तसेच, सन 2029 मध्ये मुंबईत सक्रिय राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. “ज्या ठिकाणी अन्याय होईल, तिथे संघर्ष करा, धाक निर्माण करा आणि गरज पडल्यास आंदोलन करा. निवडणुका संपल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही, त्यामुळे गावोगाव संघटित होऊन जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करा,” असे आवाहन त्यांनी केले.
2024 चं लोकसभा चित्र काय होत?
शरद पवार गटाकडून उभे राहिलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला होता. मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच निलेश लंके आणि सुजय विखे-पाटील यांच्याच अटीतटीची लढाई होती. निलेश लंके आघाडीवर तर कधी सुजय विखे पाटील आघाडीवर जात होते, अखेर लंके यांनी गुलाल उधळला.
कोरोनाकाळात निलेश लंके यांनी केलेल्या कामाचा त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा झालेला दिसत आहे. निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले होते. मात्र सुजय विखे पाटील यांच्या घरासाठी मोठा धक्का मानला जात होता. दरम्यान, विखे यांचा आता आपण लंके यांना पराभूत करू असा सूर आहे. अशातच लंके यांनी लोकसभेतून माघार घेण्याचे संकेत दिल्याने विखे विरुद्ध कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.